Wardha Flood Alert : पावसाळा तोंडावर आला असून वर्धा जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण ताकदीने कंबर कसली आहे. भौगोलिक परिस्थिती आणि मागील काही वर्षांमधील पावसाचा पॅटर्न पाहता, यंदा मान्सूनच्या काळात नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील तब्बल २१३ गावे ही नदीकाठावर वसलेली असून त्यांना मुसळधार पावसामुळे पुराचा सर्वाधिक धोका आहे. यापैकी २७ गावांचा संपर्क पावसाळ्यात मुख्य रस्त्यांशी पूर्णपणे तुटण्याची भीती असल्याने प्रशासनाने संपूर्ण यंत्रणेला ‘हायअलर्ट’वर ठेवले आहे.
‘या’ तालुक्यांमधील गावांचा तुटणार संपर्क!
मुसळधार पाऊस किंवा धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील पाच प्रमुख तालुक्यांमधील २७ गावांना बेटाचे स्वरूप येऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने खालील भागांचा समावेश होतो:
सेलू तालुका:
- खीरसमुद्र
- हिंगणी शहर
देवळी तालुका:
- दिगडोह
- दिघी
- बोपापूर
आर्वी तालुका:
- जळगाव
- शिरपूर
- नांदपूर
- कर्माबाद
- वर्धमनेरी
हिंगणघाट तालुका:
- कान्होली
- गोविंदपूर
- उमरा
- पारडी
- सुजातपूर
- रामनगर
- नांदरा
- बाबापूर
- कोरा
- मंगरूळ
समुद्रपूर तालुका:
- उबदा
- औरंगपूर
- सेवा
- आसोला
जिल्ह्यातील ‘या’ १२ प्रमुख नद्या ठरणार केंद्रबिंदू
वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या लहान-मोठ्या नद्यांना पूर आल्यास आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो. प्रशासनाने प्रमुख १२ नद्यांवर विशेष लक्ष ठेवले आहे, ज्यामध्ये खालील नद्यांचा समावेश आहे:
- वर्धा
- वणा
- धाम
- पोथरा
- बोर
- यशोदा
- बाकळी
- भदाडी
- चोड
- कढ
- शेर
- नांद
Also Read | Wardha Accident News : बुडणाऱ्या भाच्याला वाचवले, पण मामावरच काळाचा घाला.
प्रशासनाची तयारी: बोट आणि बचाव पथके तैनात!
संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच विशेष कृती आराखडा तयार केला आहे.
१. अत्यावश्यक पुरवठा:
संपर्क तुटणाऱ्या २७ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वीच पुरेसा धान्य साठा, औषधोपचार आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
२. रेस्क्यू टीम सज्ज:
पूरप्रवण क्षेत्रात शोध व बचाव पथके, बोटी आणि जीवरक्षक साहित्य तैनात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
३. २४ तास नियंत्रण कक्ष:
नद्यांच्या पाण्याच्या पातळीवर २४ तास बारीक लक्ष ठेवण्यासाठी अद्ययावत नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जात आहे.
मागील वर्षातील कटू आठवणी | Wardha Flood Alert
२६ जून २०२५:
अतिवृष्टीमुळे यशोदा नदी ओलांडताना ३ नागरिक पुरात अडकले होते.
९ जुलै २०२५:
हिंगणघाट तालुक्यातील चानकी येथील ४ मजूर पुरात अडकले होते.
१७ सप्टेंबर २०२५:
अतिवृष्टीमुळे आर्वी तालुक्यातील सोनोरा येथील १५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते.
गेल्या मान्सून काळात विविध दुर्घटनांमध्ये सेलू, हिंगणघाट, वर्धा आणि देवळी मिळून एकूण ८ व्यक्तींचा मृत्युमुखी पडले होते.
Also Read | Wardha : एसटी स्मार्ट कार्डच्या नावाखाली प्रवाशांची लूट? वर्ध्यात धक्कादायक प्रकार
नागरिकांसाठी विशेष आवाहन-
“नदीच्या काठावर असलेल्या सगळ्या २१३ गावांतील नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पावसाचे ताजे अपडेट्स, पूरपरिस्थितीची थेट माहिती आणि प्रशासकीय निर्णयांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!
