Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात.
यवतमाळ जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती विभागात या निधी संकलनात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार करुन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
ध्वजदिन निधी संकलनात विभागात यवतमाळ जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी
विभागात अव्वल तर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात 2023 मध्ये यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात प्रथम तर विदर्भात द्वितीय क्रमांकावर आहे. या उत्कृष्ट कामासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रशासनाचे आणि यात हातभार लावणाऱ्या यंत्रणेचे अभिनंदन करीत जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांचा सन्मान केला.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी हे जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष आहेत. मुंबई राजभवन येथे समारंभात त्यांच्या समवेत सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी नरहरी शेंडगे उपस्थित होते.
का केला जातो ध्वजनिधी संकलन.
भारतीय भूदल, नौदल व हवाईदलातील वीरगती लाभलेल्या जवानांचे स्मरण करणे आणि अपंग सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणकारी योजनांसाठी निधी उभारणे यासाठी दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस संपुर्ण भारतात सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून पाळला जातो.यात शाळा कॉलेज मधील विद्यार्थी सुद्धा खूप परिश्रमपूर्वक निधी संकलन साठी नागरिकांकडून योगदान घेत आपला हातभार लावतात.
ध्वजदिन निधी संकलनासाठी 59 लाख 68 हजाराचे टारगेट,आणि 88 लाख 82 हजार 266 रुपये झाले जमा.
ध्वजदिन निधी संकलनासाठी 2023 या वर्षाकरिता जिल्ह्यास राज्य शासनाने 59लक्ष 68 हजारचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांच्या मार्गदर्शनात तब्बल 88 लाख 82 हजार 266 रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या 148.83 टक्के एवढा निधी संकलित करण्यात आला.यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो शाळा, महाविद्यालये, संस्था, कारखाने, सरकारी, निमसरकारी कार्यालयांनी आजी माजी सैनिकांचे देशासाठी योगदान पाहता या ध्वजदिन निधी संकलनसाठी सढळ हाताने मदत केली.विशेष म्हणजे सरकार या निधीतून सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविते.सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस दिलेले दान हे सर्वोत्तम दानापैकी एक असते. त्यामुळे प्रत्येकाने हा निधी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी केले आहे.