Phone Robbery: शहरातील रविवारचा बाजार मोबाइल चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे. तर दुसरीकडे मोबाइल चोरी ऐवजी हरविल्याची नोंद घेतली जात आहे. यामुळे चोरट्यांचे आणखी फावत आहे. नागपुरातून यवतमाळात दाखल होणाऱ्या टोळक्याने आतापर्यंत शेकडो मोबाइल लंपास केले आहेत. मात्र, त्यांचा अजूनही सुगावा लागला नाही.
रविवारी सकाळी शहरातील विठ्ठलवाडी भाजी बाजारातून तब्बल सहा जणांचे मोबाइल चोरीला गेले. याची मोबाइल हरविल्याची नोंद घेण्यात आली आहे. यावरून चोरटे पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसून येते. तर सामान्य नागरिक यामुळे धास्तावले आहेत. व्यंकटेश बावणे (रा. वडगाव), सतीश जाधव, ललितकुमार उके (दोघेही रा. बेलोरा ता. यवतमाळ).
संदीप वानखडे (रा. गिलानी नगर), अजय चांभारे (रा. यवतमाळ), रियाजोद्दिन जीयाऊद्दिन काझी (रा. जीवन नगर यवतमाळ) हे सहा जण भाजी खरेदीसाठी विठ्ठलवाडी भाजी बाजारात आले होते. येथील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अलगदपणे मोबाइल काढून पळ काढला. काही मिनिटांतच त्यांनी हा कारनामा करून पळ काढला.
हा प्रकार बराच उशिरा लक्षात आल्यानंतर सर्वांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली यवतमाळ शहरात नागपूर येथून अल्पवयीन मुलांची टोळी दाखल होते. या टोळीच्या उच्छादाने अनेकांचा मोबाइल खिशात असुरक्षित झाला आहे. चोरीच्या मोबाइलचा वापर ऑनलाईन फसवणुकीच्या कामी केला जातो. याचे मोठे नेटवर्क सक्रिय असून आतापर्यंत पोलिसांना याचा शोध घेता आलेला नाही.
काही महिन्यांपूर्वी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी यावर काम केले. मात्र, पुढे बंदोबस्ताचा ताण वाढताच हा महत्त्वपूर्ण तपास मागे पडला आहे. यामुळेच चोरट्यांना चांगली संधी मिळत आहे. या ठिकाणी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात.