काळजी घेण्याची आवश्यकता : थंडीपासून स्वत:चा बचाव हाच उपाय.
वणी : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रात्री व पहाटेच्या तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. या काळात ज्येष्ठांना हृदयविकार आणि लकव्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अचानक बदललेले वातावरण, तापमानात झालेली घट यामुळे हृदयविकार किंवा लकवा होण्याची शक्यता बळावते. थंडीमुळे शरीरातील पेशी आकुंचन पावतात. त्याचा परिणाम हृदयावर होतो.
त्यामुळे या काळात ज्येष्ठांनी थंडीपासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. तसेच संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. हिवाळ्यातील तीव्र थंडीमध्ये अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्याचे कारणही तसेच आहे. अचानक बदललेले वातावरण शरीर लगेच स्विकारत नाही. त्यातून आरोग्यावर परिणाम होतात. त्यातून अनेक विकार होण्याची शक्यता असते.
त्यात ज्येष्ठ नागरिकांना हृदविकाराचा झटका किंवा लकवा होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या काळात नियमित व्यायाम व संतुलित आहार सोबतच भरपूर पाणी पिणे आवश्यक ठरते.
या काळात आहार काय घ्याल?
या काळात प्रत्येकानेच संतुलित आहार घेतला पाहिजे. जेवणात हिरव्या भाजीपाल्यांचा वापर केला पाहिजे. या काळात तेलात तळलेले पदार्थ आणि साखरेचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते.
किमान तापमान २५ अंशांवर.
वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा पारा अधिक असतो. हिवाळ्यातील तापमान अनेकदा २५ अंशापर्यंत खाली उतरते. त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो.
थंडी वाढली म्हणून पाणी कमी करू नका.
हिवाळ्यात फारशी तहान लागत नाही. त्यामुळे सर्वचजण कमी प्रमाणात पाणी पितात. मात्र, ही बाबदेखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या काळात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
लकवा, हृदयरोगाचा धोका.
हिवाळ्यात भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत मॉर्निंग वॉक करण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. ज्यांना हृदयाचा त्रास आहे, त्यांनी थंडीत बाहेर पडणे टाळले पाहिजे. तसे न केल्यास लकवा किंवा हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.
नियमीत व्यायाम करा.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना मोक्या प्रमाणावर घडतात. अलिकडे अकाली हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यासोबतच अनेकांना या काळात लकव्याचाही त्रास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या काळात प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. थंडीच्या काळात प्रत्येकाने उबदार कपड्यांचा वापर केला पाहिजे. संतुलित आहार घेण्यासोबतच नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. ज्यांना हृदयरोग आहे, त्यांनी सकाळी थंडीत घराबाहेर पडणे टाळावे. – डॉ. गणेश लिमजे, वणी