धुळ्यात OBC बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फाडला Maratha समाजाचा अध्यादेश.
राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्वच मागण्या मान्य केल्याचे अध्यादेशाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज बांधवांमधून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले असून, आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव साठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाज बांधवांनी शासनाने काढलेला अध्यादेश फाडत निषेध व्यक्त केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. मराठा समाजाचे सर्वेक्षण करून ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांनी केली होती. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंबंधीचा अध्यादेश काढल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले आहेत.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला असून, आज ओबीसी समाज बांधवांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. यावेळी ओबीसी समाज बांधवांनी राज्य सरकारने काढलेला मराठा समाज बांधवांसाठीचा अध्यादेश फाडत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काढलेला अध्यादेश हा बेकायदेशीर असल्याचा आरोप यावेळी ओबीसी समाज बांधवांनी केला.